महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू झाल्याबद्दल भाजपचा आनंदोत्सव; अंबाबाईला अभिषेक

कोल्हापूर (दिनांक १९) (सलीम शेख): कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू झाल्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्या वतीने आज अंबाबाई मंदिरात अभिषेक करण्यात आला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
गेल्या ४२ वर्षांपासून कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार आणि विविध संघटनांनी सर्किट बेंचसाठी मोठा संघर्ष केला होता. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान प्रशासनामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे जाधव यांनी नमूद केले.
या निर्णयामुळे कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळेल आणि सहा जिल्ह्यांतील नागरिकांचे वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, खंडपीठासाठी आवश्यक असलेली शेंडा पार्क येथील जमीन लवकरच हस्तांतरित केली जाईल, ज्यामुळे भविष्यात येथे पूर्णवेळ खंडपीठ स्थापन होण्याचा मार्ग सुकर होईल, असेही ते म्हणाले.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह अमर साठे, विराज चिखलीकर, धनश्री तोडकर, राजू मोरे, हेमंत आराध्ये, अशोक देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button