महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापूर-पन्हाळा रत्नागिरी मार्गावर पाणी, वाहतूक ठप्प; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा!

पन्हाळा (सलीम शेख ) : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर-पन्हाळा रत्नागिरी मार्गावरील रजपूतवाडी, केर्ली, केर्ले आणि चिखली या भागांतील मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. यामुळे या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.


कोल्हापुरात सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीचे पाणी पात्राबाहेर पडून अनेक सखल भागांत शिरले आहे. याच कारणामुळे कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले आहे. काही ठिकाणी पर्यायी मार्गांचा वापर सुरू असला, तरी अनेक महत्त्वाचे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत.या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. घराबाहेर पडण्यापूर्वी मुख्य रस्त्यांची सद्यस्थिती प्रशासनाकडे चौकशी करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.


सामाजिक कार्यकर्त्यांकडून सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.सोनतळी येथील सामाजिक कार्यकर्ते अभिषेक गावडे यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. “नागरिकांनी पाण्यातून वाहने चालवू नये स्वतः व कुटुंबाची काळजी घ्यावी. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी मार्गांचा शोध घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत, नागरिक आणि प्रशासनाने योग्य समन्वय साधून सुरक्षिततेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button