राधानगरी धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

राधानगरी (सलीम शेख ) : जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाल्याने राधानगरी धरणामध्ये पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने आज दुपारी १२:५८ वाजता धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक ३ पुन्हा उघडले आहे. सध्या धरणाचे दोन दरवाजे (क्र. ३ आणि ६) खुले असून, त्यातून एकूण ४,३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये स्वयंचलित दरवाजांमधून २,८५६ क्युसेक, तर बीओटी पॉवर हाऊसमधून १,५०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
पाण्याचा वाढलेला हा विसर्ग पाहता, नदीपात्रातील पाणीपातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नदीकाठच्या भागात अनावश्यक हालचाल करणे टाळावे.स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सतर्कता बाळगावी अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहे.दरम्यान, हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहावे.




