महानगरपालिका कंत्राटी कामगार कायम: ऐतिहासिक लढ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आमदार क्षीरसागर यांना समाधान!

कोल्हापूर (सलीम शेख) : गेल्या अनेक वर्षांपासून अल्प वेतनावर आणि आर्थिक अडचणीत काम करणाऱ्या महानगरपालिका कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याच्या ऐतिहासिक लढ्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत दिलेला शब्द पाळत मागील वर्षी याच दिवशी कामगारांना कायम सेवेत घेण्यासंबंधीचा महत्त्वपूर्ण ‘शासन निर्णय (जी. आर.)’ निघाला होता. या यशाबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मोठे समाधान व्यक्त केले.
महानगरपालिका कंत्राटी कामगारांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत होते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. आमदार क्षीरसागर यांनी या कामगारांचा प्रश्न हाती घेऊन तो शासन दरबारी लावून धरला. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी कामगारांना कायम करण्याचा शब्द दिला होता.
या संदर्भात बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून या कामगारांच्या आयुष्यात अंधार होता. त्यांच्यासाठी मी शासन दरबारी जो पाठपुरावा केला, त्याचे यश म्हणून मागील वर्षी याच दिवशी शासन निर्णय निघाला. एका ऐतिहासिक लढ्याला यश मिळाले आणि हजारो कामगारांच्या चेहऱ्यावर हसू आले, त्यांच्या जीवनात आनंद आणल्याचे मोठे समाधान मला मिळाले आहे.”
आमदार क्षीरसागर यांच्या या प्रयत्नांमुळे महानगरपालिकेच्या हजारो कंत्राटी कामगारांचे भविष्य सुरक्षित झाले असून, त्यांना कायम सेवेमुळे स्थिरता आणि सामाजिक सुरक्षा प्राप्त झाली आहे. या ‘जी. आर.’ मुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, आजच्या वर्षपूर्तीमुळे पुन्हा एकदा या ऐतिहासिक निर्णयाची आठवण झाली आहे.




