महाराष्ट्र ग्रामीण
सायबर चौकात ट्रकचे ब्रेक फेल; चार वाहनांना धडक, जीवितहानी टळली!

राजारामपुरी (सलीम शेख ) : मंगळवारी रात्री कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात भीषण अपघात घडला. एका मालवाहू ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने ट्रक अनियंत्रित झाला आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या चार वाहनांना एकामागून एक जोरदार धडक दिली. या धडकेत एका चारचाकी वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघात इतका गंभीर होता की मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने कोणाचाही जीव गेला नाही. या घटनेत दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. ब्रेक फेल झालेल्या ट्रकच्या चालकाची चौकशी सुरू असून, अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.




