मुरगूडच्या मुख्य बाजारपेठेत आता ‘दिवसांनुसार पार्किंग’; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनासह नागरिकांचा मास्टर प्लॅन!

मुरगूड (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): शहराचे हृदय असलेल्या ‘महात्मा गांधी मेन रोड’वरील वर्षानुवर्षांची वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी येथील सजग नागरिक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रशासनाकडे केवळ तक्रार न करता, नागरिकांनी स्वतःच ‘अल्टरनेट डे पार्किंग’ (दिवसांनुसार पार्किंग) ही नवी संकल्पना सुचवली असून, याबाबतचे सविस्तर निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्षा सौ. सुहासनीदेवी पाटील, उपनगराध्यक्षा श्रीमती. रेखाताई मांगले, मुख्याधिकारी अतिश वाळुंज, नगरसेवक मा. सत्यजितसिंह पाटील (आबा), नगरसेवक राहुल शिंदे, नगरसेविका गीतांजली अंगज, नगरसेविका वैशाली गोधडे तसेच संभाजी अंगज सर, राजू कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांनी नागरिकांच्या या प्रस्तावाचे स्वागत करत शहराला शिस्त लावण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त पार्क केली जात असल्याने पादचारी, शालेय मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन खालील वेळापत्रक सुचवण्यात आले आहे: बुधवार, शुक्रवार आणि रविवार: रस्त्याची पूर्व बाजू पार्किंगसाठी. गुरुवार, शनिवार आणि सोमवार: रस्त्याची पश्चिम बाजू पार्किंगसाठी. मंगळवार (बाजार दिवस): मुख्य रस्ता पार्किंगमुक्त ठेवून पादचाऱ्यांना प्राधान्य देणे.
निवेदन स्वीकारताना मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांनी या प्रस्तावावर तातडीने विचार करून अंमलबजावणीचे संकेत दिले आहेत. तसेच मुरगूड पोलीस स्टेशनचे स.पो.नी. शिवाजी करे, आणि ठाणे अंमलदार अमर कुंभार यांनीही पोलीस प्रशासनाच्या वतीने या नियोजनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रस्तावामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना होणारी कोंडी कमी होऊन रस्ता रुंद मिळेल, ज्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायातही वृद्धी होईल.
निवेदन देताना विजय खोत, शिकंदर जमादार पत्रकार, यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अर्जावर नागरिक व व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत. यावेळी संभाजी अंगज सर आणि राजू कांबळे यांनी ही या उपक्रमाची दखल घेत नागरिकांच्या या जागरूकतेचे कौतुक केले. मुरगूडकरांच्या या सामूहिक पुढाकारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे महात्मा गांधी मेन रोड लवकरच ‘स्मार्ट आणि शिस्तबद्ध’ मार्ग म्हणून ओळखला जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.




