कोल्हापूर खंडपीठाच्या सर्किट बेंचचे ऐतिहासिक उद्घाटन!

कोल्हापूर: तब्बल चार दशकांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूर सर्किट बेंचची ऐतिहासिक स्थापना १६ ऑगस्ट रोजी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते या खंडपीठाचे उद्घाटन राधाबाई बिल्डिंग या ऐतिहासिक वास्तूत मोठ्या थाटामाटात पार पडले. या सोहळ्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा आनंद गगनात मावेनासा झाला.

या उद्घाटन सोहळ्यासाठी न्यायमूर्ती गवई यांचे कोल्हापुरात आगमन होताच, नागरिकांनी त्यांच्या वाहनावर पुष्पवृष्टी करून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रेमळ स्वागताने न्यायमूर्ती भारावून गेल्याचे दिसून आले.

१९३१ साली छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापुरात उच्च न्यायालयाची स्थापना केली होती आणि त्यासाठी त्यांनी आपल्या भगिनींच्या नावाने “राधाबाई बिल्डिंग” ही भव्य वास्तू उभारली होती. आज त्याच ऐतिहासिक ठिकाणी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची सुरुवात झाल्याने कोल्हापूरच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळाला आहे.
या नव्या खंडपीठाच्या स्थापनेमुळे आता वकिलांना आणि सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार आहे. हा सोहळा कोल्हापूरसह परिसरातील सर्व जिल्ह्यांसाठी एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण ठरला.




