महाराष्ट्र ग्रामीण

एड्स सारख्या गंभीर आजाराविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आवश्यक: सावंत!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला) : मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या मेंदू, भावना आणि वर्तनात सुसंगतता राहत नाही, ज्यामुळे ताण-तणाव वाढतो आणि ते व्यसनाधीनतेच्या आहारी जातात. भविष्यात एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग, टीबी आणि कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे समुपदेशक दीपक सावंत यांनी व्यक्त केले. उजळाईवाडी येथील केडीसीए इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘एचआयव्ही व एड्स विषयक संवेदनशीलता’ या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. डी. हिरेमठ होते.
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्या वतीने ‘ईन्टेंसिफाइड आयईसी कॅम्पेन’ अंतर्गत एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती मोहीम सुरू आहे. या मोहिमेत खेडेगावातील ग्रामस्थ, महिला, युवक, कंपनी कामगार आणि शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
कार्यशाळेत सावंत यांनी एचआयव्ही संसर्गाची प्रमुख कारणे स्पष्ट केली. असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्ताचा वापर, दूषित सुई आणि एचआयव्ही बाधित आईकडून गर्भातील बाळास संसर्ग होण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेला कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, प्रकल्प अधिकारी मोहन सातपुते, संजय गायकवाड, युवराज पाटील, सागर परिट, सीमा पाटील, प्रा. रोशनी कुंभार, प्रा. श्रुती कुंडले, सोनबा गुरव, प्रदीप आवळे, प्रणव विद्यार्थी, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग, गोकुळ शिरगाव यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button