उजळाईवाडी मध्ये वाढदिवसाच्या दिवशी तलवारीने हल्ला, आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल!
कणेरी (इरफान मुल्ला) : दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता उजळाईवाडी परिसरात वाढदिवस साजरा करत असलेल्या युवकावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी अनिकेत राजू काटे (वय २८, रा. रेणुका कॉलनी, उजळाईवाडी) यांनी रजपूत स्वीट्स येथे केक आणण्यासाठी गेले असताना आरोपी अक्षय पाटील, रोहन पाटील आणि त्यांचे सहा अनोळखी साथीदारांनी संगनमत करून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. फिर्यादीच्या मानेवर वार झाला असून उजव्या हाताच्या दोन बोटांना गंभीर इजा झाली आहे. घरात घुसून दहशत
हल्ल्यानंतर आरोपी प्रतिक ऊर्फ बंड्या केसरकर यांच्या घरात घुसले. त्याच्या आई सुनिता केसरकर यांना तलवारीने धमकावले आणि अंगणातील पाण्याचे बॅरेल फोडून दहशत निर्माण केली. आरोपींनी बेकरीतील काचा फोडून शटर बंद केले आणि घटनास्थळावरून पळून गेले. गुन्हेगारी पार्श्वभूमी
मुख्य आरोपी अक्षय पाटील याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. रोहन पाटील याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.या प्रकरणी भारतीय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बादोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.ही घटना परिसरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी गंभीर आव्हान ठरली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.




