महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूडमध्ये ‘एकता दौड’ उत्साहात पार; 500 हून अधिक विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग

मुरगूड (बाळासो कांबळे ): भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती संपूर्ण देशभर ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. याच निमित्ताने मुरगूड पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘एकता दौड’ प्रचंड उत्साहात पार पडली. सोशल मीडियाद्वारे केलेल्या आवाहनामुळे या दौडीबद्दल नागरिकांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

सकाळचे ७:०० वाजता मुरगूड पोलीस ठाण्यातून या एकता दौडीला सुरुवात झाली. दौडीच्या प्रारंभी, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी उपस्थितांना एकता दौडीचे महत्त्व समजावून सांगितले आणि देशाला एकसंध ठेवण्यासाठी पटेल यांच्या योगदानाला उजाळा दिला.

यानंतर, सुमारे 500 हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि नागरिकांनी या दौडीत सक्रिय सहभाग घेतला. दौडीचा मार्ग खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आला होता:

मुरगूड पोलीस ठाणे – तुकाराम चौक – शिवतीर्थ मुरगूड – मुरगूड नाका नंबर १ –
नवी पेठ – राणा प्रताप चौक – राजीव गांधी चौक – परत मुरगूड पोलीस ठाणे –
या दौडीमुळे शहराचे रस्ते अक्षरशः ‘एकतेच्या रंगात’ फुलून गेले होते, आणि शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दौड यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली आणि त्यानंतर दौडीचा समारोप झाला. समारोपाच्या वेळी सहायक फौजदार प्रशांत गोजारी यांनी सर्वांचे आभार मानले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पोलीस पाटील संघटना कागल अध्यक्ष अप्पासो पवार, शिवभक्त सर्जेराव भाट, बळीराजा अकॅडमीचे संस्थापक अजित पाटील, ओंकार पोतदार, शेलार अकॅडमीचे संस्थापक सुनील शेलार, विनर अकॅडमीचे अक्षय गोरुले, वस्ताद पांडुरंग पुजारी यांच्यासह मुरगूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पोलीस पाटील, बळीराजा अकॅडमी, विनर अकॅडमी, सुनील शेलार फाउंडेशनचे सर्व विद्यार्थी आणि शिवभक्त संघटना मुरगूडचे सदस्य उपस्थित होते. या एकता दौडीमुळे मुरगूड शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button